IAPAR

Categories
Uncategorized

World Theatre Day 2022 Message

(Featured Image Credits – Ruth Walz for Peter Sellars)

This year’s World Theatre Day message from the International Theatre Institute is authored by Peter Sellars, an opera, theatre and festival director who has gained international renown for his ground-breaking and transformative interpretations of classics, advocacy of 20th century and contemporary music, and collaborative projects with an extraordinary range of creative and performing artists. His work illuminates the power of art as a means of moral expression and social action.

To view the message in Assamese, translated by Bornali S Deka and Jugesh Kalita on the ITI website, click here.

More translations of the WTD 2022 message can be found below.

Categories
Uncategorized

माकड, माणूस आणि डार्विन

(डार्विन या एकल नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने)

सुमारे दोन वर्षांपूर्वी माझी पत्नी मृणालिनी मला डार्विन विषयी काही सांगत होती. माझा आणि डार्विनचा संबंध शाळेच्या पाठ्यपुस्तकातला ‘उत्क्रांती सिद्धांताचा जनक’ इतपतच मर्यादित होता. दोन मार्काच्या गाळलेल्या जागा भरा किंवा जोड्या लावा मध्ये हे येत असे. आपण माकडापासून तयार झालो (!) या विचाराची मला तेंव्हा फार मजा वाटली होती. पण त्या दिवशी ती जे काही बोलत होती ते ऐकून मी थोडासा गडबडून गेलो होतो. मनुष्यप्राणी माकडापासून निर्माण झाला असं डार्विन म्हणालेलाच नाही हे ऐकून मी गोंधळून गेलो. म्हणजे लहानपणापासून आपण जे समजत होतो ते तसं नाहीये? अजूनही आजूबाजूला डार्विन विषयी कुणी काही बोललंच तर ते एव्हढच असतं. आणि ही सांगतेय कि ते तसं नाहीये! मग आम्ही खूप बोललो. डार्विनच्या संपूर्ण प्रवासाबद्दल तिनं अनेक विस्मयकारक गोष्टी सांगितल्या. मी तिला विचारले की ती डार्विनवर नाटक लिहू शकेल का? आणि तिनं होकार दिला!

डार्विन हा काही रूढार्थानं नाटकाचा विषय नाही. तो मुख्यतः अभ्यासाचा विषय आहे. विज्ञानाच्या आकलनामध्ये डार्विनचं योगदान ही काही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाही. नाट्यपूर्ण असली तरी. मग याचं नाटक करताना ते रंजक होईल का? की केवळ उपदेशपर चर्चानाट्य असं त्याचं स्वरूप असेल? तसं तर नक्कीच नको होतं. माणूस म्हणूनही डार्विन काही जगावेगळा नव्हता. चारचौघांसारखाच एक सामान्य मुलगा होता. शालेय अभ्यासात फारसं लक्ष नसलेला, वडिलांच्या दबावाला घाबरून राहणारा! पण आजूबाजूचं जग मात्र तो निरखून बघत असे. त्याला भटकंतीची नितांत आवड होती. दगड, किडे, फुलपाखरं, झाडं याचं निरीक्षण करताना तो तासनतास रमून जात असे. या गोष्टीचं नाटक होऊ शकेल?

हे नाट्यलेखन आणि मग नाट्यनिर्मिती ही एक दीर्घकालीन प्रक्रिया होती. मृणालनं नाटकाचा पहिला मसुदा फार लवकर पूर्ण केला. आणि मग नंतर दुसरा आणि नंतर तिसरा… आणि मग त्यावर काम करण्याची माझी पाळी होती. आणि याच सुमारास जगामध्ये कोरोना हा एक नवा शब्द उदयाला येत होता. फार काही समजायच्या आतच त्यानं संपूर्ण जगाचा ताबा घेतला. आणि मग उत्क्रांतीच्या प्रक्रियेतली ही नवी मजा बघत डार्विन विंगेत जाऊन थांबला!

या प्रक्रियेमध्ये मला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला. हे नाटक काही डार्विनचे चरित्र नव्हे. ही एका शास्त्रज्ञाची अशी जीवनगाथा आहे जिच्यामुळे मानवजातीचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. त्याच्या संशोधनामुळे माणसांत, माणसाच्या जगाविषयीच्या आकलनात मोठा फरक पडला.  

डार्विन ज्या कालखंडात होता त्या काळात विज्ञान हे धार्मिक कल्पनांच्या पलीकडे जाऊ शकत नव्हतं. तशी परवानगीच नव्हती. गलिलिओला ज्या प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला होता त्या परीस्थितीत इतकी शतकं उलटून गेल्यावरही फारसा फरक पडलेला नव्हता. परमेश्वराच्या अस्तित्वाला आव्हान देणं हा काही डार्विनचा हेतू नव्हता, पण त्याच्यासमोर जे उलगडत होतं त्यामुळे त्या परमेश्वराविषयी खूपच प्रश्न निर्माण होत होते. ख्रिश्चन चर्चच्या मान्यताप्राप्त चौकटीला न मानवणारं काहीतरी त्याला गवसलं होतं.

मृणालनं लिहिलेल्या संहितेमध्ये तीन भाग आपल्या समोर येतात. पहिला भाग हा डार्विनच्या बालपणीचा आणि तरुणपणाचा आहे. या वयात त्याला अनेक प्रश्न पडत होते आणि त्यांची उत्तरं त्याला पाठ्यपुस्तकांमध्ये सापडत नव्हती. त्याची शोधक नजर आणि संशोधक वृत्ती यांना खतपाणी मिळत होतं. आयुष्यभराचे मित्र जोडले जात होते. त्याही काळात मेडिकलला अडमिशन घेणं सामाजिकदृष्ट्या महत्वाचं होतं. त्याच्या वडिलांची तशी दृढ इच्छा होती. पण त्याला मात्र मेडिकल शिक्षणात रस वाटत नव्हता. या स्थितीतून मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याच्या समोर एक मोठी संधी आली. पृथ्वी प्रदक्षिणा करण्याच्या एका सफरीची. इथून या नाटकाचा दुसरा भाग सुरु होतो. एच. एम. एस. बीगल या जहाजावरून त्यानं केलेली पृथ्वी प्रदक्षिणा, त्याला झालेलं जगाचं दर्शन, आपल्या समोर येतं. दक्षिण अमेरिका, पसिफिक महासागर, गालापागोस बेटसमूह, हिंदी महासागर अशा विविध ठिकाणांना भेटी देत त्यानं आपला अभ्यास सुरु ठेवला होता. आणि त्या सगळ्याचा अन्वयार्थ लावण्याचा त्याचा प्रयत्न आपल्याला दिसू लागतो. आणि तिसऱ्या भागात आपल्याला दिसतो तो या सगळ्या गोष्टींकडे एकविसाव्या शतकात येऊन बघणारा डार्विन. जुन्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता नवनवीन प्रश्न शोधणारा आणि त्यांची उत्तरं शोधण्याची जबाबदारी प्रेक्षकांची आहे याचं भान देणारा.   

ही डार्विनची गोष्ट प्रेक्षकाना कशी बरं सांगावी? डार्विन स्वतः त्याची गोष्ट सांगत असेल का? की एकविसाव्या शतकातील एक अभिनेता ही गोष्ट सांगत असेल? डार्विन आणि निवेदक अशी दुहेरी भूमिका निभावणारा अभिनेता असेल का? तो केवळ कथावाचक असेल? की प्रेक्षकांना कथा सांगता सांगता अनुभवही निर्माण करणारा असेल?

लॉकडाऊनच्या काळात या प्रश्नांशी आम्ही दोघेही लढत होतो. हा प्रयोग एकाच नटानं करण्याचा आहे हेही एव्हाना अगदी स्पष्ट होतं. आणि ते मीच करावं असंही वाटत होतं. त्यामुळे ते दिसेल कसं याबरोबरच ते पाठ कसं करायचं याचंही एक ओझं होतंच. चार-पाच वर्षांपूर्वी अनिरुद्धनं बसवलेल्या ‘पार्टी’ या नाटकात काम केल्यापासून माझाही अभिनयाचा उत्साह थोडा वाढलेला होता. आणि डार्विन हे त्या दृष्टीनं उत्तम आव्हान होतं.

या दरम्यानच्या काळात मी अजून एका एकल प्रयोगावर काम करत होतो. आदिती वेंकटेश्वरन या गुणी अभिनेत्री आणि नर्तिकेनं लिहिलेलं ‘Fall Again, Fly Better’ हे इंग्रजी एकल नाटक आम्ही स्काईपवर तालमी करून तयार करत होतो. त्यामुळे ते पूर्ण झालं की डार्विन करायला घ्यायचं असं ठरवलं होतं. ते नाटक हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे, त्यामुळे त्याविषयी सविस्तर पुढे लिहीनच. त्या नाटकाचा पहिला प्रयोग नाट्यगृह खुली होताच झाला आणि मग डार्विनच्या तालमी सुरु झाल्या.   

डार्विनची तालीम सुरु करण्यापूर्वी मृणालला हे नाटक डॉ. मंदार दातार या संशोधक मित्राला वाचून दाखवायचं होतं. मंदार पुण्याच्या आघारकर संस्थेत संशोधक म्हणून कार्यरत आहे. आणि डार्विन हा त्याचा अत्यंत प्रेमाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. त्याच्यासमोर नाटकाचं वाचन झालं. त्यानं हिरवा बावटा दाखवल्यानंतरच तालमीला सुरुवात झाली.

तालीम करताना सुरवातीचा पुष्कळसा काळ हे आपल्याच्यानं पाठ होईल का या चिंतेत गेला. मी एकल प्रयोग केल्याला काही दशकं उलटून गेली होती आणि मधल्या कालखंडात माझं संपूर्ण लक्ष दिग्दर्शन आणि प्रशिक्षणाकडे होतं. अभिनयाची सवयही सुटल्यासारखी झाली होती. पण नटाची म्हणून जी एक आंतरिक प्रक्रिया सुरु होते ती केंव्हाच झाली होती. आणि उभं राहून तालीम सुरु झाल्यावर अधिकाधिक मजा येत गेली. या तालमीला आदिती, आशिष वझे, विक्रांत ठकार अशी तरूण मित्रमंडळी हजर असत. त्यांची निरीक्षणं ऐकणं, सूचना ऐकून पुढच्या तालमीत योग्य ते बदल करणं अशा गोष्टी सुरूच होत्या. मृणाल तालमीला आली तर मला जरा अधिक टेन्शन येत असे. ती माझ्यापेक्षा अधिक अभ्यासू आहेच. विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य या विविध प्रांतांमध्ये ती लीलया मुशाफिरी करत असते. त्यामुळे तिनं लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला काही ना काही अत्यंत महत्वाचे संदर्भ असत. त्यातलं काहीही आपल्याकडून सुटू नये याची काळजी मी सातत्यानं घेत असे.

उभं राहून तालमी सुरु करताना नेपथ्याचा एक ढोबळ आराखडा माझ्या डोक्यात होता. टेबल-खुर्ची मला अपरिहार्य वाटत होतं. त्याव्यतिरिक्त अनेक छोट्या मोठ्या वस्तू वापरल्या जाणार होत्या. वेशभूषा कशी असावी यावरही बराच खल झाला. एक गोष्ट नक्की ठरली होती की डार्विनसारखं दिसण्याचा प्रयत्न करायचा नाही. पण तो कालखंड उभा करण्याचा प्रयत्न मात्र जरूर करायचा. स्मिता तावरेनं ही जबाबदारी लीलया पार पाडली. तिच्या बरोबरीनं आशिष वझे यानंही अपरिमित कष्ट घेतले. नेपथ्य, वेशभूषा योग्य रीतीनं व्हावं यासाठी या दोघांनीही तुळशीबाग, लक्ष्मी रोड किती वेळा पालथे घातले त्याला काही अंतच नव्हता. नाटकाची प्रकाशयोजना विक्रांत ठकार यानं केलेली आहे. नाटक समजावून घेऊन, तालमींना नियमित हजर राहून, समोर निर्माण होणारं दृश्य अधिकाधिक अर्थपूर्ण करण्यावर त्यानं भर दिला. डार्विनची अभ्यासिका, समुद्र, जहाज आणि इतर असंख्य जागा त्यानं प्रकाशयोजनेतून जिवंत केल्या. या नाटकाचं संगीत ही एक अवघड गोष्ट होती. ते एका काळाशी नाळ जोडणारं तर हवंच होतं, पण त्याबरोबरच त्यामध्ये कुठलाही परकेपणा नको होता. नाटक बघताना प्रेक्षकाला सहज आपल्याबरोबर घेऊन जाणारं हवं होतं. संगीताबरोबरच विविध ध्वनींचाही वापर यात होता. आदितीनं हे सगळं अतिशय उत्तम रीतीनं पेललं. डार्विनचं आवडतं संगीत कुठलं होतं ते तिनं शोधून काढलं आणि त्याचाही यथोचित वापर केला. एकूणात काय तर प्रयोगाचं रसायन चांगलं जमून येत होतं.

या नाटकाच्या शेवटाकडे एक वाक्य आहे:

“खरी गोष्ट तुम्ही जाणता… आपण काही माकडापासून झालो नाही, माणूस काही माकडापासून झाला नाही. तर माणूस आणि माकड यांचा पूर्वज एक होता.”

हे वाक्य म्हणताना समोर बसलेल्या अनेक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर मला एक भलं मोठं प्रश्नचिन्ह दिसतं. कारण आपल्यापैकी अनेकजण खरी गोष्टी जाणत नाहीत! या नाटकाच्या निमित्तानं अशा अनेक खऱ्या गोष्टी जाणून घेता आल्या. डार्विनचा हात धरून दोन मार्कांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करता आला. विज्ञानाकडे वेगळ्या नजरेनं पाहता आलं.

नाटकाच्या प्रत्यक्ष प्रयोगाविषयी याहून अधिक काही लिहित नाही. डार्विनच्या आणि बीगलच्या प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात होईलच. सध्याची बंदिस्त स्थिती लौकरच संपून जाऊ दे आणि आपल्या सगळ्यांच्या समोर प्रत्यक्ष रंगमंचावर याचा प्रयोग करता येऊ दे हीच सदिच्छा. भेटूच!

विद्यानिधी वनारसे (प्रसाद)
भ्रमणध्वनी: +९१ ९१३०० २५७५६
इमेल: iapar.india@gmail.com

‘माकड, माणूस आणि डार्विन’ हा लेख यापूर्वी कणकवली येथील कै. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या ‘रंगवाचा’ या त्रैमासिकात प्रकाशित झाला आहे.

Categories
Uncategorized

कोरोना आणि कलेचा ‘काळ’

कोरोना या प्रकरणाविषयी २०२० सालच्या सुरवातीपर्यंत जनसामान्यांना कल्पनाही नव्हती. फारतर करोना नावाची एक बुटांची कंपनी माहित होती. जगाच्या इतिहासात येऊन गेलेल्या साथीच्या रोगांची माहिती शालेय इतिहासात येऊन गेली होती. आणि त्यावेळी तरी त्या माहितीची व्याप्ती वार्षिक परीक्षेबरोबर संपत होती. हे असं काही आपल्या अनुभवाला येईल याची पुसटशी कल्पनाही कुणी करत नव्हतं. आधुनिक वैद्यकशास्त्र आणि प्रगतीपथावर असलेली मानवजात आता यापुढे असल्या यःकश्चित आणि क्षुल्लक आजारांना अजिबात भीक घालणार नाही याची खात्री होती. आधुनिक मानव हा या सगळ्याच्या खूप वर आलेला आहे याविषयी कुणाच्याही मनात तिळमात्रही शंका नव्हती.

पण गतवर्षीपासून सगळं जग संपूर्णपणे कोरोनामय झालं आहे. कुठल्याही दोन व्यक्तींचं संभाषण हा शब्द किमान एकदा उच्चारल्याशिवाय संपत नाही. किमान एकदा!

या सगळ्या कालावधीत अनेक गोष्टी घडून गेल्या. सुरवातीला तर याचं गांभीर्य फारसं लक्षातही आलं नव्हतं. मार्च २०२० मध्ये जेंव्हा पहिला लॉकडाऊन झाला त्यावेळी, पंधरा दिवसांचा तर प्रश्न आहे असं वाटत होतं. फार तर तीन आठवडे… अगदीच ताणलं तर एप्रिल अखेर. एक क्षुल्लक व्हायरस तो काय… पण तो पुरून उरला. अजूनही आहे. आणि तो जाण्याची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. उलट तो दीर्घकाळ आपली सोबत करणार आहे अशीच चिन्हं आहेत.

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येईपर्यंत अनेकांची वाताहात झाली होती. शासकीय पातळीवर खूप धावपळ सुरु होती. या कालखंडात लोकांना मदत करायची म्हणजे काय करायचं हे लक्षात यायलाही खूप वेळ गेला. हा मुद्दा शासनाला दोष देण्याचा नाही. शासन म्हणजे आपल्यासारखीच माणसं आहेत. त्यांनीही हे कधी अनुभवलेलं नव्हतं. अचानक कुणीतरी डोक्यात दगड घातल्यासारखी शासनाची अवस्था झाली होती.

हे सगळं आत्ता लिहिण्याचं कारण म्हणजे या काळात कलावंतांची झालेली परवड. समाज म्हणून आपण कलेकडे आणि कलावंतांकडे कसे पहातो, शासन म्हणून आपल्या लेखी कलेची आणि कलावंतांची किंमत काय अशा प्रश्नांची काहीशी माहित असलेली पण मान्य करायला अवघड अशी उत्तरं स्पष्टपणे समोर येत गेली. आपल्या समृद्ध संस्कृतीच्या वारश्याचा (आणि तो समृद्ध आहेच) डांगोरा पिटत असताना तो वारसा सांभाळणाऱ्या मंडळींकडे केलं जाणारं दुर्लक्ष आणि अवहेलना असहनीय आहे. सर्व प्रकारच्या समाज घटकांचा विचार होत असताना कला आणि कलावंत यांचा स्वच्छपणे पडलेला विसर हा अंगावर येणारा आहे.  

कोरोनानं माणसाला स्वतःकडे पेशींच्या पातळीवरून बघायला शिकवलं. मोठी गोष्ट झाली. पण माणूस म्हणजे केवळ पेशींचा समूह नाही ना… त्याला जिवंत राहण्यासोबतच आपल्यातलं माणूसपण ओळखण्याची, जपण्याची आणि जोपासण्याचीही आस आहे. आणि कला ही माणसाला तिथवर नेणारी एक वाट आहे. कलावंताला डावलून या वाटेवर कसं चालता येऊ शकेल?  

बहुसंख्य कलाकार मंडळी ही हातावर पोट असणाऱ्या असंघटीत कामगारांप्रमाणे असतात. रोज काम केलं तरच त्यांना पैसे मिळतात. त्यांना कुठलीही नोकरी नसते. आणि कुठल्याही मेहनातान्याची हमी नसते. किमान वेतन कायदा नसतो. तुमच्या निगोसिएशन कौशल्यावर तुमचा मेहनताना ठरतो. याला अर्थातच काही अपवाद आहेत. पण मूलतः पैसे देणाऱ्याची मेहेरबानी महत्वाची होऊन बसते.

समाज म्हणून आपण कलावंतांच्या आर्थिक परिस्थितीविषयी संपूर्णपणे अनभिज्ञ असतो. “ते स्टार लोक आहेत! सेलिब्रिटी आहेत! बक्कळ पैसे मिळवतात!” हे वाक्य अत्यंत नगण्य अशा कलावंत संख्येला लागू होते. बहुसंख्य कलावंत हे ‘स्टार’ नसतात. ते कष्टकरी असतात. कला हे क्षेत्र त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलेलं असतं पण त्याचा व्यवसाय कसा करायचा याची अनेकांना अजिबात कल्पना नसते. अर्थात यालाही आपले सामाजिक समज कारणीभूत आहेत. कला ही जन्मजात असावी लागते इथपासून ते विविध मंडळींना लहान किंवा तरूण वयात प्रती-लता, प्रती-आशा, प्रती-बच्चन, अशी विशेषणे लावून त्यांची शिकण्याची उर्मी संपवून टाकण्यापर्यंत अनेक गोष्टी आपण करत रहातो. वेगवेगळे आयडॉल्स, सम्राट आणि सारेगंपुंच्या गोष्टी बघत राहतो. मला अनेकदा असं वाटतं की हा एक सामाजिक कट आहे की काय? कलावंताला महान म्हणायचं, त्याची कला अनमोल-अमूल्य आहे वगैरे म्हणायचं, त्याला मखरात बसवायचं आणि जवळ जवळ देवत्व बहाल करून टाकायचं. आणि एकदा देवत्व बहाल केलं की त्याला एक नारळ दिला तरी पुरतोच की! त्यालाही रोज दुपारी बारा वाजता भूक लागते याचं भान ठेवण्याची आपल्याला गरज भासत नाही.

कला आणि रंजन या दोन भिन्न गोष्टी आहेत याचंही आकलन आपण समाज म्हणून करून घेणं गरजेचं आहे. जे जे मनोरंजन करते ते सर्व कलात्मक असेलच असं अजिबात नाही. आणि रंजन करणं हीसुद्धा काही सोपी गोष्ट नाही. पण रंजन करतो म्हणून तो कलाकार असं समीकरण बनवलं की कलात्मकतेचा, सौंदर्याचा मुद्दा पूर्णपणे गौण करता येतो. प्रसिध्द होण्याची क्षमता हा कलेचा मापदंड नसतो. आणि हे लक्षात न घेतल्यामुळेच आपल्याकडच्या असंख्य पारंपारिक कला अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचा उपयोग आपण तोंडी लावण्यापुरता आणि जाज्वल्य वगैरे अभिमान जागृत करण्यापुरताच करतो. प्रत्यक्षात त्यांच्या अस्तंगत होण्याने आपल्याला काहीही फरक पडत नाही.

गेल्या वर्षभरात आपल्याला असं दिसतं की समाजाच्या विविध घटकांना उपयोग होईल, मदत होईल असे अनेक निर्णय शासकीय पातळीवर घेण्याचा प्रयत्न झाला. पण कलावंतांसाठी कुठल्याही प्रकारची भरघोस मदत झाली नाही. काही ज्येष्ठ कलावंतांनीच पुढाकार घेऊन आपल्या खिशातून आणि आपल्या काही मित्र मंडळींच्या मदतीनं कलावंताना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला. बुडत्याला काडीचा का होईना, पण आधार मिळाला. तो स्पृहणीयच आहे. परंतु त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात काहीही घडताना दिसले नाही.

कामगारांच्या पाठीशी त्यांच्या संघटना असतात, व्यापारी संघटना असतात, चेंबर ऑफ कॉमर्स असतात, पण कलावंत हे दुर्दैवानं राजाची मर्जी बसण्याची वाट पहात राहतात. कधीतरी राजा माझ्याकडे बघेल आणि त्याच्या गळ्यातला मोत्याचा कंठा माझ्याकडे फेकेल या आशेने गात रहातात, नाचत रहातात, अभिनय करत राहतात.

कलावंत हा बहुतेक वेळा आंतरिक ओढीनंच हे सारं करीत असतो. त्याचा कलंदरपणा लपून रहात नाहीच. पण सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं, पण तो सहसा बिलंदर नसतो. त्यामुळे तो रसिक प्रेक्षकांना मायबाप वगैरे म्हणतो. पण ते मायबाप प्रयोग संपल्यावर त्याला अत्यंत निरपेक्षपणे वाऱ्यावर सोडून देतात हे कटू सत्य आपण नाकारू शकत नाही. यातही जे शहाणे असतात, हुशार असतात, त्यांना याचा सुगावा आधीच लागलेला असतो. ते स्वतःच्या जगण्याची घडी वेगळ्या पद्धतीनं बसवतात. आत्तासारख्या परिस्थितीत त्यांना याची झळ कमी लागते. पण त्यांचीही संख्या अर्थातच नगण्य.

या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकी सर्व व्यवहार सुरू झाले तरी नाट्यगृह सुरु होत नाहीत. मनोरंजनाच्या कार्यक्रमांना परवानगी मिळते पण नाट्यगृह बंदच ठेवावी लागतात. यातून कलावंताला हात चोळत बसण्यापलीकडे फारसं काही करताही येत नाही.

खरं सांगायचं तर नाट्यगृह बंदच राहणार हे समजल्यापासून कोरोनाचे धाबे दणाणले आहेत. आता आपलं कसं होणार अशी चिंता त्याला सतावू लागली आहे. तुळशीबाग, मंडई, लक्ष्मी रस्ता यापेक्षा हजारो पटींनी माणसं नाट्यगृहात असतात! तीच बंद झाली तर आपलं अस्तित्व कसं टिकणार? फक्त दिवसभराचा बाजार, रस्ते, ऑफिसेस, यांवर आपली गुजराण कशी होणार? आपल्याला संपविण्यासाठी या चतुर माणसांनी चक्क नाट्यगृह आणि चित्रपटगृह बंद करावीत? आमचा सर्वनाश करण्यासाठी असा रामबाण उपाय? आता अगदी नाईलाज म्हणून तुळशीबागेत जावं लागणार, मंडईत जावं लागणार, लक्ष्मी रोडवर जावं लागणार, उन्हातान्हात, भर पावसात आम्ही रस्त्यावर येणार… आमची हक्काची आणि लाडकी नाट्यगृह सोडून!

माझी तर खात्रीच झाली आहे की कोरोना हा एक नाट्यप्रेमी आणि चित्रपटप्रेमी जंतू आहे. (तसेही नाट्यप्रेमी आणि चित्रपटप्रेमी हे समाजाच्या दृष्टीनं जंतूच असतात). तो इतरत्र फारसा आढळत नाही. पण नाट्यगृह आणि चित्रपटगृह इथंच त्याचा मुक्काम असतो. या दोन जागा उघडल्या तर लाखोंच्या संख्येनं रसिकजन गर्दी करतील आणि कोरोनाला मेजवानीच मिळेल. सगळ्या जनतेला आता कलेचा आस्वाद घेण्याची इतकी आस लागली आहे की जिवाची पर्वा न करता तमाम लोक लोणावळा-खंडाळा आणि खडकवासला-सिंहगड या जागा रिकाम्या वाटाव्यात इतकी तुफान गर्दी करतील. धार्मिक आणि राजकीय उन्मादापेक्षा नाट्यगृह आणि चित्रपटगृह या जागा अधिक घातक आहेत. या दोन गोष्टी सुरु केल्या तर न भूतो न भविष्याती अशी परिस्थिती निर्माण होईल. कोट्यावधी माणसे मृत्युमुखी पडतील. आणि अशी भयावह परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठीच बहुधा या दोन्ही जागा बंद ठेवण्यात येऊन बाकीचे सर्व व्यवहार जवळ जवळ पूर्ववत करण्यात आले असावेत.

आमचा पिंड नाटकाचा असल्यामुळे आम्ही आमच्या नाटकांचे प्रयोग जाहीर करतो आहोत. परंतु त्याची तारीख आणि वेळ आम्ही जाहीर करू शकत नाही. त्यासाठी आम्हाला सात दिवस लागतील. सात दिवसांनी, आठव्या दिवशी काहीच न घडल्यास, अजून सात दिवस लागतील. असे किती काळ होईल याची आम्हांस कल्पना नाही. पण तोपर्यंत दहावा आणि तेरावा दिवसही उलटून गेला असल्यामुळे कावळाही शिवून गेला असेल. मग आम्ही प्रयोग करून तृप्त होऊ किंवा कलेच्या आणि कलावंतांच्या संपूर्ण मरणाची आणि पुनर्जन्माची वाट पाहू.

ता.क.: कावळा शिवला नाही तर तो त्रस्त समंध कुणाच्या मानगुटीवर बसेल ते काही सांगता येत नाही. कावळ्याचे तळतळाट लागू नयेत यासाठी संबंधितांनी आपापली काळजी घेण्याचा प्रयत्न करून बघावा.

अजून एक ता.क.: बहुतांचे जीव वाचविण्याच्या प्रयत्नात थोडेसे कलावंत मेले तरी फारसे काही बिघडत नाही. तसेही ते किरकोळच आहेत.

कलावंतांसाठी ता.क.: आपण विक्रम आणि वेताळ वाचूया… तशीही डोक्याची शंभर शकले होतच आहेत… पण विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही हे लक्षात ठेवूया..

#कोरोनाव्हायरसचाकोरस #नाटकमरूदे #संगीतमरूदे #नृत्यमरूदे #कलामरूदे